"आंबेगाव तालुक्यात वळसे पाटलांचे वर्चस्व कायम"
शिवसेनेला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
वार्ताहर ता.२७ : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाले आहे. वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून गावो गावी करोडो रुपयांची विकासकामे झाल्यामुळे मतदारांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे.शिवसेनेला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे, एकंदरीत शिवसेनेला आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे.
जिल्हा परिषदेच्या पाच पैकी चार जागा राष्ट्रवादीला , एक जागा शिवसेनेला तर पंचायत समितीमध्ये दहा पैकी सहा जागा राष्ट्रवादीला, तीन जागा शिवसेनेला तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झालेला आहे. यानिवडणुकीत भाजप काँग्रेस पक्षाने देखील उमेदवार उभे केले होते परंतु त्यांना खाते देखील उघडता आलेले नाही.
'वळसे पाटील यांनी २७ वर्षात काय विकास केला' अशी जहरी टीका आढळरावांकडून करण्यात आली होती या टीकेचा समाचार घेत वळसे पाटील यांनी देखील 'विमानतळ खेडमधून का गेले , विकास आराखड्याचा काय झालं' असे मुद्दे पुढे करत पलटवार केला. विकास काम सांगण्यावरच त्यांनी भर दिला.
गेल्या १५ वर्षात शिवसेनेला आंबेगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये अपयश येत आहे. यंदा जुन्नर आणि खेड तालुक्यात पंचायत समितीवर शिवसेनेची एक हाती सत्ता आलेली आहे परंतु खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आंबेगावात आपला करिष्मा दाखवण्यात पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत.
शिवसेनेकडून जि.प. माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी यंदा पारगाव-अवसरी या वळसे पाटील यांच्या घरच्या मतदार संघातून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीकडून वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील रिंगणात होते, संपूर्ण जिल्ह्याचे या निवडणुकीकडे लक्ष होते. अटी तटीच्या या सामन्यात विवेक वळसे पाटील यांनी बाजी मारली परंतु जास्तीचे मताधिक्य भेटू शकले नाही. गिरे यांना स्वतःच्या मेंगडेवाडीमध्ये मताधिक्य भेटू शकले नाही तर विवेक वळसे पाटील यांना अवसरी या विद्यमान जि.प. सदस्य रेवती वाडेकर यांच्या गावात मताधिक्य भेटले नाही. पारगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे संजय गवारी तर अवसरी गणातून शिवसेनेचे रवींद्र करंजखिले निवडून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत गेलेले देविदास दरेकर हे कैलासबुवा काळे यांच्या विरोधात खासदार आढळराव याचा बालेकिल्ला असणारा पेठ-घोडेगाव या गटामधून निवडून आले. मंचर-अवसरी जि प गटामधून राष्ट्रवादीचे उमेदवार अरुणा दत्तात्रय थोरात या शिवसेनेच्या प्रज्ञा सुरेश भोर याच्या विरोधात निवडून आल्या.अवसरी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे वसंत राक्षे यांनी पक्षांतर करून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली परंतु राष्ट्रवादीचे संतोष यमनाजी भोर हे विक्रमी मताधिक्याने निवडून आले. मंचर-वडगाव-वाळुंजवाडी गणातून अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांनी मंचरकरांची सहानभूती मिळवून एक नंबरचे मताधिक्य घेत विजय संपादित केला.
कळंब-चांडोली जि प गटातून राष्ट्रवादीच्या तुलसी सचिन भोर यांच्या सह पंचायत समितीच्या दोन्ही जागा चांगल्या मताधिक्याने जिंकल्या. बाजारसमितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या रणनीतीपुढे शिवसेनेचे पानिपत झाले.
अमोंडी-शिनोली जि प गटातून रूपा जगदाळे या ५००० पेक्षा जास्त मताधिक्याने घेऊन विजयी झाल्या. सुभाष मोरमारे, प्रकाश घोलप यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पंचायत समितीच्या जागा देखील चांगल्या मताधिक्याने जिंकल्या.
या निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळाले नसले तरी तालुक्यात विधानसभा निवडुकीपेक्षा यावेळी शिवसेनेचे वाढलेले मताधिक्य ही राष्ट्रवादी काँगेससाठी धोक्याची घंटा आहे.
No comments:
Post a Comment